संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारत देश ही या महामारीचा सामना करत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना बाधित आणि मृतांच्या संख्येत अमेरिका देश पहिल्या स्थानावर आहे. तर भारतात कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 12 लाखांहून अधिक असल्याचं वर्ल्डोमीटर या वेबसाईटवर नमूद आहे. या वेबसाईटवर 4 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतर अमेरिकेत केलेल्या अभ्यासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली.
भारतात कोरोनामुळे 34 ते 49 लाख जणांचा मृत्यू ) झाल्याचं अमेरिकेत केलेल्या संशोधन अभ्यासात म्हटलं आहे. ही संख्या भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीपेक्षा दहापटीने अधिक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत 4.14 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. मृतांच्या संख्येत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये 6,09,000 आणि ब्राझीलमध्ये 5,42,000 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट ही वॉशिंग्टमधील संशोधन संस्था आहे. मंगळवारी या संस्थेनं अहवाल सादर केला. या अहवालात सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज, सेरोलॉजिकल रिपोर्ट्स आणि होम इस्फेकेशन याचा आधार घेतला आहे.
अरविंद सुब्रमण्यम जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. यांच्यासह अभिषेक आनंद आणि जस्टीन सँडफर यांनी याबाबत दावा केला आहे. याच्या दाव्यानुसार, भारत देशातील मृतांची संख्या काही हजार नसून लाखोंच्या घरात आहे.
जानेवारी 2020 ते जून 2021 या काळात भारतात कोरोनामुळे जवळपास 50 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचं अमेरिकेतील संशोधन अभ्यासात म्हटलं आहे. भारतातील मृत्यूच्या अंदाजाच्या तीन प्रोफाइल तयार करण्यात आल्या आहेत. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटनं या आपल्या अहवालात या प्रोफाइल तयार केल्यात. त्यानुसार भारतातील अधिकृत कोरोना मृत्यूची संख्या दहा पटीनं जास्त असल्याचं दर्शवण्यात आलं आहे.