दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत सुनियोजित हिंसा घडवण्यात आली आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार असून त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्लीतील हिंसा हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून सुनियोजित हिंसा भडकवली गेली आहे. त्याला अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना एकक्षणही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
दिल्लीतील हिंसा ही गंभीर बाब आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन शहा यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मोदीही शहा यांना मिळालेले असल्याचं सिद्ध होईल, असं सुरजेवाला म्हणाले.
दीप सिद्धू आणि त्यांचे सहकारी लाल किल्ल्यात दाखल झाले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबतचे फोटो याच सिद्धूने सार्वजनिक केले आहेत. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावून शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या सिद्धूला अटक कार करण्यात आली नाही? शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचंच हे षडयंत्र होतं हे यावरून सिद्घ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उपद्रवींना लाल किल्ल्यात घुसवण्यात आले. तेव्हा पोलीस खुर्चीवर बसून होते. 500 ते 700 लोक लाल किल्ल्यात घुसू कसे शकतात. उपद्रवी लोक लाल किल्ल्यात घुसण्याची प्लॅनिंग करत होते आणि घुसलेही तेव्हा गृहमंत्री काय करत होते?, असा सवाल त्यांनी केला. भाजपशी संबंधित सिद्धू या प्रकरणात असणं यातून सर्व काही स्पष्ट होतंय. लाल किल्ल्यावर झेंडा का लावू दिला? त्यावेळी पोलीस खुर्चीवर बसून होते आणि मीडियाचे कॅमेरे लाल किल्ल्याच्या दिशेने होते, असा दावाही त्यांनी केला.