डिजीटल स्वाक्षरी सातबारा सेवा देण्याचा शुभारंभ 1 मेपासून होणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलीय. या घोषणेच्या अनुषंगानं सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. कमी वेळेत, कमी श्रमता शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.
राज्यात 43 हजार 948 महसुली गावे आहेत. त्यापैकी 40 हजार महसुली गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी 250 तालुक्यातील 100 टक्के गावांचे सातबाराचे काम पूर्ण झाले आहे. अशा 30 हजार गावांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने हे केलेले ऐतिहासिक काम सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे.
1 मेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणारा डिजिटल स्वाक्षरी सातबारा सर्व शासकीय आणि निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी या संगणकीय सातबाऱ्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नसणार आहे.



