दिल्ली दारु घोटाळ्यात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यामुळे ते शनिवारी कारागृहाबाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. आपण दोन दिवसात राजीनामा देणार असून निवडणुकीपर्यंत कोणी दुसरा नेता मुख्यमंत्री होईल. मात्र निवडणूक आयोगानं महाराष्ट्राबरोबर दिल्लीच्याही निवडणूक घ्यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानं कारागृहातून सुटका झाली आहे. यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. मात्र दिल्लीची विधानसभा भंग करण्यात येणार नाही. निवडणूक होईपर्यंत आम आदमी पक्षाच्या इतर नेत्याकडं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.



