पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे. आता मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असून देशाची उच्चांकी प्रगती होईल.
संपूर्ण पृथ्वीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत, ज्यांनी राज्यकारभारात लोकांचा सहभाग घेतला. त्यामुळे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक आहेत. समता लोककल्याणाचा विचार अनेकांनी भाषणापुरता मर्यादित ठेवला. परंतु शिवरायांना अभिप्रेत असलेला समतेचा विचार अस्तित्वात आणण्याचा संकल्प श्री मोदींनी केला आणि तो सत्यात उतरवला आहे.
काँग्रेसचे नेते निवडणुकीपुरत्या अनेक थापा मारतात. मात्र निवडणूक झाल्यानंतर ते मतदारांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे महाविकास आघाडीची वाटचाल ही अधोगतीच्या मार्गाने सुरू आहे. काँग्रेसने दुष्काळाच्या नावानं मतांचा जोगवा मागितला पण सिंचन प्रकल्प रखडवले. अनेक गावांचा पिण्याचा प्रश्नही सोडवला नाही. अनेक वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेस नेत्यांना अहंकार चढला होता, काम केलं नाही तरी जनता आपल्या पाठीशी राहील, असे त्यांना वाटत होते परंतु जनतेने दहा वर्षांपूर्वी परिवर्तन घडवून त्यांना धडा शिकवला आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेल्या पर्यटन विकास, औद्योगिक विकास यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून जिल्ह्यात सुसज्ज आयटी पार्क उभारण्यासाठी निश्चितपणे उपाययोजना केली जाईल. सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांची जन्मभूमी हीच कर्मभूमी ठरावी, यासाठी प्रयत्न करून त्यांचे इतर जिल्ह्यातील विस्थापन थांबवणार आहे.
काँग्रेसचा हा तर ब्लेम गेम…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतेच्या विचारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले आहे. काँग्रेसचे नेते ब्लेम गेम खेळत भाजपवर संविधान बदलाचा आरोप करत आहेत. वास्तविक, पाहता काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणीला लादून संविधानाच्या खात्मा करण्याचा प्रयत्न केला होता.
नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे देशातील पहिले प्रधानमंत्री आहेत. याचे राहुल गांधींना वाईट वाटते आहे. देशातील जनतेला आर्थिक सामाजिक स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी झटत आहेत.