सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीने ही माहिती समोर आणली आहे. दरम्यान, याप्रकरणी हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत गाडीवरुन जात असताना तीन अज्ञानातांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर गाडी थांबवली आणि काहीच न बोलता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. हेरंब कुलकर्णी यांना त्या अज्ञातांनी रॉडने मारहाण केली. त्यानंतर हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळात हल्लेखोर तिथून निघून गेले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर चार टाके पडले आहेत.