सातारा जिल्ह्यातील कष्टकरी , हमाल ., शेतकरी , शेतमजूरांचे नेते व खंडाळा तालुका पाणी पंचायतीचे नेते नेते ॲड. बाळासाहेब बागवान यांचे आज संध्याकाळी सात वाजता लोणंद येथे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ , पाणी संघर्ष चळवळ , हमाल पंचायत या चळवळींशी बाळासाहेबांचे नाते , ऋणानुबंध जवळचा होता. बाळासाहेब बागवान ही जरी काँग्रेसी विचाराचे होते तरी कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे एक योद्धे होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळ व लोकायतच्यावतीने महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा या यात्रेच्या सातारा येथील सभेचे ते अध्यक्ष होते. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या पाणी संघर्ष चळवळीत त्यांनी जीव ओतून काम केले. परिवर्तनवादी चळवळीत जेष्ठ विचारवंत डॅा बाबा आढाव , स्मृतीशेष डॉ नरेंद्र दाभोलकर , तसेच श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते डॉ भारत पाटणकर , विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कॉ. धनाजी गुरव यांच्यासह अनेक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
सध्या बाळासाहेब बागवान हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर प्रदेश प्रतिनिधी , सातारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत होते. हिंदू मुस्लिम ऐक्याचा , सलोख्याचा ते सतत ध्यास घेत. त्यासाठी जीव ओतून काम केले.
अशा या सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याला व चळवळीतील गेल्या चाळीस वर्षाच्या सहकाऱ्याला मुकलो आहोत.
दुष्काळी खंडाळा तालुक्याला पाणी मिळावे यासाठी त्यांनी संघर्ष केला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात समाजवादी युवक दलाच्या वतीने आम्ही सातारा ते औरंगाबाद पायी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाच्या आयोजनात व लोणंदच्या सर्व नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही त्यांनी भरीव असे सहकार्य केले होते. चळवळीतील जवळचा सहकारी आपल्यातुन गेला आहे.



