“महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,” अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवे यांनी आज नवी मुंबईतील जाऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उष्माघातामुळे 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला झाला.
अंबादास दानवे म्हणाले की, “कालची दुर्घटना अतिशय दुर्दैवी होती. आज मी रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांच्यावर रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत, यात शंका नाही. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता. मी स्पष्ट बोलतो सांस्कृतिक विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण याची जबाबदारी सरकारची होती. या घटनेमुळे सरकारचं नाव खराब झालं आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.”
आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या आकडेवारीबाबत साशंकता व्यक्त करत आहेत. आकडा लपवला जात आहे, असंही म्हटलं जात आहे. काय खरं आहे, ते समोर येऊ द्या, लपवा लपवी करु नका, असं आवाहनही अंबादास दानवे यांनी केली.
दरम्यान, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार घ्यायला बोलवलं होतं. कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने गेलं होतं. सामान्यत: महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा राजभवनात केला जातो. मैदानात कार्यक्रम ठेवत असाल तर स्वत:च्या स्टेजपुरता निवारा करता, लोकांसाठी का नाही? या कार्यक्रमासाठी 15 कोटींचा खर्च केला, मात्र व्यवस्था पुरवली नाही. जर सरकारमध्ये ताकद नव्हती तर मैदानात सोहळा आयोजित करायला नको होता, राजभवनवर करायला होता, असं अंबादास दानवे म्हणाले.