मागील निवडणुकांच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण सत्तेत आल्यानंतर दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळाले नाही. कारण सत्तेत आल्यावर मुख्यमंत्र्यांना न्यायालय आठवते, पण त्यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान न्यायालय आठवले नसल्याचा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला. तसेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
औरंगाबादमधील काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहनही केले आहे. सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम होणार नसल्याचे समन्वयकांकडून सांगण्यात आले असले तरी खासगी वाहने रस्त्यावर उतरू देणार नसल्याचा पवित्रा मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.