Saturday, March 7, 2026
HomeMain Newsदिल्ली पोलिसांनी गाझीपूरचे बॅरिकेड्स हटवले

दिल्ली पोलिसांनी गाझीपूरचे बॅरिकेड्स हटवले

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथे शेतीविरोधी कायद्याच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स आणि वायर काढण्यास सुरुवात केली.

लोखंडी आणि सिमेंटच्या बॅरिकेड्सचे अनेक थर आणि कॉन्सर्टिना वायरचे किमान पाच थर गेल्या वर्षी टाकण्यात आले होते. तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात, या वर्षी २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर ते आणखी बळकट करण्यात आले होते.

शुक्रवारी पोलिस उपायुक्त (पूर्व) प्रियंका कश्यप यांनी सांगितले की, “राष्ट्रीय महामार्ग ९ वरील बॅरिकेड्स हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरते बॅरिकेडिंग हटवण्यात आले होते. तर राष्ट्रीय महामार्ग २४ आधीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.”

हा रस्ता सुरू झाल्याने गाझियाबाद, दिल्ली, नोएडा येथील हजारो प्रवाशांना तसेच राष्ट्रीय राजधानी आणि उत्तर प्रदेशच्या अंतर्गत भागांतून मेरठ आणि त्यापलीकडे प्रवास करणाऱ्यांना मदत होईल.

पोलिस अधिकारी आणि मजूर गाझीपूर येथे राष्ट्रीय महामार्ग ९ वर ठोकलेले लोखंडी खिळे काढताना दिसले. त्याच ठिकाणी मुख्यत्वे भारतीय किसान युनियन (BKU) चे शेकडो आंदोलक नोव्हेंबर २०२० पासून रस्त्यावर आंदोलन करत आहेत.

भारतीय किसान युनियन ही शेतकरी सामूहिक संयुक्त किसान मोर्चा (SKM) च्या नेतृत्वाखालील शेतकरी कायदा विरोधी आंदोलनात सहभागी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या २१ ऑक्टोबरच्या रस्ते खुले करण्याच्या निर्देशानंतर बॅरिकेड्स हटवण्यात आले असून, सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमांवरील वाहतूक प्रवाशांना सुरू होईल.

गेल्या वर्षी लागू करण्यात आलेले तीन वादग्रस्त कायदे शेतकरी हिताच्या विरोधात असल्याचा दावा आंदोलक शेतकरी करत असताना, केंद्र सरकार मात्र हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगत आहे.

हजारो शेतकरी २६ नोव्हेंबर २०२० पासून केंद्राच्या शेती कायद्यांचा विरोध करत टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांवर तळ ठोकून आहेत.

गुरुवारी रात्री टिकरी बॉर्डरवरील नाकेबंदी हटवण्याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी लावलेले काही बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाने २१ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, तीन कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु ते अनिश्चित काळासाठी रस्ते रोखू शकत नाहीत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments