Friday, August 8, 2025
HomeMain Newsखासदार राजीव सातव यांचे निधन

खासदार राजीव सातव यांचे निधन

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान पुण्यात निधन झाले. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत असल्याने आणि कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी २१ एप्रिलला चाचणी केली होती. त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने २३ एप्रिलला त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

२५ एप्रिलनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. ते कोरोनातून बरे झाले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचे निधन झाल्याची माहिती दिली. “निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिले पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवले होते आणि आजपर्यंत ते माझ्याबरोबर चालत होते. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचे हास्य, जमिनीशी असलेले त्यांचे नाते, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा,” अशा शब्दात सुरजेवाला यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

“मित्र गामावल्याने आपण दुःखी आहोत. कॉँग्रेसच्या आदर्शांवर निष्ठा ठेऊन चालणारा प्रचंड ताकत असणारा राजीव हा नेता होता”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणू राजीव संताव ओळखले जात. हिंगोली येथील माजी मंत्री रजनी सातव यांचे ते पुत्र होते. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास होता.

राजीव सातव यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीने गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सन २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत यश मिळवले होते.

राजीव सातव यांनी फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ असे चार वर्षे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यापूर्वी ते युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते.

त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments