(जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, ४ डिसेंबर १९२२ निधन : पुणे, १४ नोव्हेंबर २०११)
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफानी दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.
त्यांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशाला प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. यासाठी त्यांनी पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण सोडून दिले. तासगांव येथे युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. स्वातंत्र्यलढ्याच्या या आंदोलनासाठी लागणारा खर्च व हत्यारे खरेदीसाठी त्यांनी शेणोली व धुळे येथे रेल्वेगाडी लुटली होती. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांनी सांभाळले. देशात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना त्यावेळच्या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते.
*तुफानी दल*
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी. लाड होते.या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्य वीर आकाराम (दादा) पवार होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्रपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल, बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नागनाथअण्णा नायकवडी, उत्तमराव पाटील या सहकार्यांसोबत साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटणार्या या क्रांतिकारकांचे नेतृत्व बापू लाड यांनी केले. या लुटीवेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊन ते मैलोन्मैल चालले.