अंधेरीच्या गोखले पुलाच्या डागडुजीची जबाबदारी पालिकेची नव्हेतर रेल्वे प्रशासनाची असल्याची प्रतिक्रिया मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर महाडेश्वर यांनी पुलाची डागडुजी व्यवस्थित झाली नसल्याचा आरोपही केला आहे.
हा पूल मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येत नसल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे. अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. रेल्वे ट्रॅकवर पुलाच्या सिमेंटचा भाग कोसळल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या युद्धपातळीवर रुळावरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, आरपीएफ, फायरब्रिगेड, डिझास्टर कंट्रोलची टीम घटनास्थळी दाखल झालीय. ढिगाऱ्याखाली आणखीन नागरिक अडकले आहेत का? याची चाचपणी मदत यंत्रणा करत आहे.