गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
सातारा शहराजवळ असणाऱ्या जकातवाडी आणि ढेबेवाडी गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. गेल्या 15 दिवसांपासून या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाले होते.
या दुर्घटनेत काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे हे दोघेही जखमी झाले होते. जवळपास 15 दिवसांपासून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रेबीजवर कोणतंही औषध नसल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान जकातवाडी आणि ढेबेवाडी या दोन्ही गावाच्या शेजारीच सातारा शहराचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोच्या ठिकाणी अनेक भटकी कुत्री येत असतात. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यानेच ही कुत्री या कचरा डेपोच्या परिसरातून गावात येतात.
याचा मोठा फटका रुपाली आणि देवानंद या तरुण पिढीला बसला आहे. या दोघांच्या मृत्यूनतंर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.