कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. येत्या 7 ऑक्टोबर रोजी म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मिळतेय. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.
राज्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, दारुची दुकाने, मॉल्स आदी सुरु करण्यात आले. मात्र, मंदिरं बंद असल्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्य जनतेत राज्य सरकारविरोधात नाराजी वाढत होती. भाजप, मनसेसह अनेक संघटनांनी राज्य सरकारविरोधात घंटानाद आंदोलनं केली. तरिही राज्य सरकारनं मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला नव्हता. गणेशोत्सव काळातही मंदिरे बंदच ठेवण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवानंतरच्या स्थितीचा आढावा घेत आज राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
दरम्यान आज सकाळी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून अहवाल मागवला आहे. महाविद्यालय कधी सुरु करायची याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत महणाले आहेत.