लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात बालविवाहाची अनेक प्रकरणं उघडकीस आले आहेत. दरम्यानच्या काळात उस्मानाबाद येथील एका अल्पवयीन मुलीचं तिच्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या तरुणासोबत बालविवाह लावून देण्यात आला होता. लग्नानंतर काही दिवसातच संबंधित मुलीचा भयावह पद्धतीने मृत्यू ओढावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणदूर येथील रहिवासी असणाऱ्या 15 वर्षीय प्रतीक्षाचा लॉकडाऊनच्या काळात तिच्या वयापेक्षा दुप्पट वय असणाऱ्या अजित बोंदरशी बालविवाह लावून देण्यात आला होता. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अत्यंत कमी वऱ्हाडींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला होता. पीडित मुलगी लग्नानंतर लगेच गरोदर राहिल्याने तिला लहान वयात बाळंतपणास सामोरं जावं लागलं आहे. यातच तिचा भयावह मृत्यू झाला ( minor mother died while giving birth of child) आहे.
मृत प्रतीक्षा अजित बोंदर हिला 7 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद येथील जिल्हा महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण अशक्तपणामुळे प्रतीक्षाची प्रकृती खालावली. त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी प्रतीक्षाला सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. दरम्यान तिचा कोविड अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिची प्रकृती आणखीच ढासळली. 14 ऑक्टोबर रोजी प्रतीक्षाची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. पण प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रतीक्षाचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी मृत प्रतीक्षावर उस्मानाबाद येथील उतमी कायापुरात अंत्यसंस्कार केले.
घटनेच्या दहा दिवसांनंतर गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित घटनेला वाचा फोडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधात्मक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



