“लोकांना ढुंगण धुवायला फिल्टरचे पाणी मिळतं, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही. ती माणसं आहेत मग आम्ही माणसं नाहीत का? आम्ही आदिवासी जनावरं आहोत का? तुम्ही तरी हे घाणीचे पाणी प्याल का? तुमच्या सारखे लोक आमच्या वाडीत आले तर आम्ही तुम्हाला प्यायला हे घाण पाणी कसं देणार”? हा प्रश्न विचारलाय रायगड जिल्ह्यातील आय.एस. ओ. मानांकन प्राप्त दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या खैरासवाडी या आदिवासी गावातील रंजना वाघमारे यांनी. येथील नागरीकांची पाचवी पिढी आज पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करत आहे. मोलमजुरी करणे, लाकूडफाटा गोळा करणे हे या आदिवासी वाडीतील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. पण गावातील स्त्रियांचा संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जातो. मग मजुरी करायची कधी? लाकूडफाटा गोळा करायचा कधी? आणि मुलाबाळांना खाऊ घालायचे काय? याची चिंता त्यांना दररोजच सतावत असते.