जर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान बाप्पासाठी थर्माकॉलचं मखर किंवा सजावट करण्याचा विचार करत असला, तर तो विचार आताच विसर्जित करा. कारण थर्माकॉलच्या मखरावरची आणि सजावट साहित्यावरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.
गणेशोत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी खूप पूर्वी होते. मात्र राज्य सरकारने मार्चमध्ये प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी लागू होते. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असून यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करणारी याचिका करण्यात आली होती. उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळत थर्माकॉलबंदी कायम ठेवलीये.
गणेशोत्सवातील मखरांसाठी अनेक महिने आधीच घाऊक विक्रेत्यांकडे ऑर्डर येतात आणि त्याप्रमाणे मखर तयार करण्याकरिता घाऊक विक्रेत्यांकडून खूप पूर्वीच थर्माकोलची खरेदी होते. यानुसार, कलाकारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यापूर्वीच केली आहे. पण बंदीमुळे त्यांचे मोठे नुकसान होईल.
गणेशोत्सव संपण्याच्या दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत मिळाल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल, असा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्याचबरोबर उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले होते. मात्र, याविषयी न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती याचिका फेटाळून लावली.